श्रीरामपूर : शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी श्रीरामपूर बाजार समितीने उपबाजार मार्केट निर्मिती करून बाजार समितीचा विस्तार करावा. चांगले काम करत असताना अडचणी येत असतात त्याला तोंड देत पुढे जात राहावे. आता तर तुमच्याकडे विरोधकच नसल्यामुळे आता चांगले निर्णय घेता येतील. मार्केट कमिटीने जनावरांचा बाजार, फुल मार्केट सुरू करून बाजार समितीने नावलौकिक मिळवावा, असे आवाहन आ. हेमंत ओगले यांनी केले.
श्रीरामपूर बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सभापती सुधीर नवले होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, मुळा प्रवराचे माजी संचालक सिद्धार्थ मुरकुटे, बाजार समिती संचालक सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुद्धे, राजू चक्रनारायण, दशरथ पिसे, मयूर पटारे, सोन्याबापु शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, प्रमोद भोसले, पंडित बोंबले आदी उपस्थित होते.
आ. ओगले म्हणाले चांगले काम करणाऱ्याला त्रासाला सामोरे जावे लागते लढणे व संघर्ष करणे ही ओघाने येते बाजार समितीच्या सत्ताधाऱ्या विरोधात 16 याचिका दाखल होत्या पैकी 13 चा निकाल बाजूने लागला आहे यावरूनच संघर्षाची जाणीव होते. बाजार समितीत असलेले शेतकरी भोजनालय पुन्हा सुरू करावे पोलीस चौकी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू तसेच राहुरी नगर येथील कांदा लिलाव कशा पद्धतीने होता त्याची पाहणी करावी या ठिकाणी बाजार समितीने रुग्णालय सुरू करण्याची मागणी पुढे आली. मात्र आपले उपजिल्हा रुग्णालय राज्यात सगळ्यात चांगले आहे त्याची एकदा पाहणी करावी, तसेच बाजार समितीने व अशोक कारखान्याने मनावर घेतले तर रुग्णालय ही उभारता येईल यासाठी सिद्धार्थ मुरकुटे यांनी मार्केट कमिटीच्यावतीने वकिली करण्याचा सल्लाही त्यांनी दिला
अधिवेशनात टिळक नगर इंडस्ट्रीजच्यावतीने सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वीस ते पंचवीस फुटावर घेण्यात आलेल्या बोरवेलला पाण्याचा रंग लाल असतो याबाबत कंपनीने आपल्या एसटीपी प्लांटमधून पाण्याचे शुद्धीकरण करावे, आपण अशी मागणी केली होती मात्र आपल्या मागणीचा विपर्यास करण्यात आला असून आपण कंपनी बंद करा रोजगार घालवा असे कुठेही म्हटलेले नाही ज्या दत्तनगरने आपल्याला सर्वाधिक मताधिक्य दिले त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण नेहमीच बरोबर असतो. केवळ दूषित पाण्याचा विषय मांडल्यामुळे पन्नास वर्षाची कंपनी बंद होणार नाही. याउलट येथील एमआयडीसी वाढण्यासाठी अन्य उद्योजकांची चर्चा सुरू आहे. 220 केवीए उपकेंद्रासाठीही आपण प्रयत्न केला नुकतेच त्याचे भूमिपूजनही झाले आहे वर्षभरात हे काम मार्गी लागेल एमआयडीसीत नवनवीन उद्योग घेऊन रोजगार वाढीसाठी आपण प्रयत्न केला असून मदर डेरी या दूध उत्पादन क्षेत्रातील मोठ्या उद्योगास बरोबर ही आपली चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
प्रास्ताविक करताना सुधीर नवले यांनी बाजार समितीला 1 कोटी 55 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. बाजार समितीचे उत्पन्न 4 कोटी 55 लाख रुपये इतके झालेले आहे. अंतर्गत काँक्रिटीकरण व इतर विकास कामे सुरू आहेत मात्र विरोधकांकडून वारंवार दाखल होणाऱ्या याचिका व तक्रारीमुळे या कामास बाधा येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. गुजर म्हणाले 30 हजार रुपये उलाढाल असलेली ही बाजार समिती आता साडेचार कोटी रुपयांच्या उत्पन्नापर्यंत झेप घेतली आहे. अशोक कारखान्याप्रमाणेच श्रीरामपूर बाजार समितीत होणारे 200 ते 250 कोटींपर्यंत आहे.
सिद्धार्थ मुरकुटे यांनी बाजार समितीचे विस्ताराची गरज असून उंदीरगाव तसेच समृद्धी महामार्ग जवळील गावात व शेती महामंडळाकडे जमिनीची मागणी करून नवीन उपबाजार निर्मिती करावी.
करण ससाणे म्हणाले बाजार समितीची नेहमीच शेतकऱ्यांना मदतीची भूमिका असते बाजार समितीने अभ्यास दौरे आयोजित करावे. बाजार समितीत विकास कामांना पणनने मंजुरी दिली नाही तर त्यासाठी न्यायालयात जावे लागते असे त्यांनी सांगितले.
टाकळीभान उपबाजार समितीत शौचालयाची दुरवस्था झाली असून ते दुरुस्त करावे, हमाल भवन बांधण्याची गरज आहे पूर्वीप्रमाणे पान बाजार व जनावरांचा बाजार सुरू व्हावा, नवीन जागा घेऊन सुसज्ज मंगल कार्यालय सुरू करावे बाजार समितीचे आवारात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता केली जात असल्याने सुसज्ज संरक्षित बादली जावी तसेच शेतकऱ्यांच्या मुलींसाठी रुग्णालयाची इमारत उभी करून उच्च शिक्षित डॉक्टरांची नेमणूक करावी, निळवंडेचे पाणी सोडल्यानंतर जलपूजन व श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसून येते. मात्र या भागातील शेतकऱ्यांनी किती सात नंबरचे फॉर्म भरले हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळे आगामी काळ संघर्षाचा असून हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे संचालकांना लासलगाव येवला, पिंपळगाव बसवंत यासारख्या बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव कसे होतात यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करावे, मार्केट कमिटीचे कांदा लिलावाची पद्धत चुकीची आहे त्यावर मार्केट कमिटीची कमांड नाही खुल्या बाजारातही कर्मचाऱ्यांचे प्रभुत्व नाही आदी मागण्या करत मनोज हिवराळे दत्ता कुरे मुरलीधर राऊत भाऊसाहेब पारखे भरत पवार रमेश कोठारी आदींनी चर्चेत भाग घेतला.
अहवाल वाचन सचिव साहेबराव वाबळे यांनी केले सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. यावेळी कांदा उत्पादक भाजीपाला उत्पादक व्यापारी आडत गाळेधारक यांचा मान्यवरांच्या हस्ते येथे गौरव करण्यात आला.

