१२ गुन्हे दाखल असल्याने आरोपीला तडीपार करण्याचे निर्देश
मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला परिसरात दिनांक ९ जून २०२५ रोजी, पोलिसांनी धाड टाकून ५१० किलो गोमांस आणि एक जिवंत वासरू जप्त केले. या ठिकाणी अनधिकृतपणे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले असून, याप्रकरणी कैफ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपीविरोधात यापूर्वी अशाच स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल असून, सदर आरोपी सध्या अटकेत आहे. या गुन्ह्याबाबत कायद्यात पाच वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. आगामी अधिवेशना पर्यंत ह्या कायद्यात उचित सुधारणा करून जे सराईत गुन्हेगार असतील त्यांना १० वर्षांची शिक्षा व दंडाची कारवाई होईल अशी तरतूद करण्याची घोषणा सभागृहात केली.
विधानसभेत आज आमदार संजय उपाध्याय यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. दिनांक ९ जून २०२५ रोजी, बदलापूर (पश्चिम) येथे जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले. त्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, अशा घटना रोखण्यासाठी राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
राज्यात कोणी अनधिकृतपणे कत्तलखाने चालवत असल्यास, त्याबाबतची माहिती विशेष मोहिमेअंतर्गत गोळा करून कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस आणि संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, अशा गंभीर घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि जनतेच्या धार्मिक भावना लक्षात घेता, शासन सद्याच्या कायद्यात सुधारणा करून कठोर शिक्षा लागू करण्याचा विचार करीत आहे.
तसेच गोरक्षणाचे काम करत असलेल्या संस्था आणि पोलिस विभागांचा समन्वय राखण्यात येईल असेही मंत्री श्री. कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
000 00

